“धर्म, त्याग आणि राष्ट्रभक्तीचा महामहोत्सव – गुरु तेग बहादुर साहिबजींच्या शहीदी शताब्दी सोहळ्याची जय्यत तयारी”
क्षेत्रीय आयोजन समिती अध्यक्षपदी सरदार डॉ. विजय सतबीर सिंग, सहअध्यक्षपदी श्रावण चव्हाण यांची नियुक्ती
या भव्य सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींची उपस्थिती
नंदुरबार (प्रतिनिधी) : भारतीय संस्कृतीच्या अभेद्य एकात्मतेचे प्रतीक आणि हिंद-की-चादर म्हणून जगभर ओळखले जाणारे श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम शताब्दी वर्षानिमित्त नांदेड येथे भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या ऐतिहासिक सोहळ्याला भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उपस्थित राहून देशवासीयांना गुरुंच्या महान त्याग, साहस आणि धर्मरक्षणाच्या संदेशाचे स्मरण करून देणार आहेत.
राज्य शासनाच्या अल्पसंख्याक विकास विभागाच्या माध्यमातून आणि हिंद-की-चादर श्री गुरु तेग बहादुर साहिबजी ३५० वी शहीदी समागम शताब्दी राज्यस्तरीय समितीच्या संयुक्त विद्यमाने या राष्ट्रीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने राज्यस्तरीय व क्षेत्रीय आयोजन समित्या स्थापन करण्यात आल्या असून, क्षेत्रीय समितीच्या अध्यक्षपदी नांदेडचे सरदार डॉ. विजय सतबीर सिंग, कार्याध्यक्षपदी सरजीत सिंग मेजर पंजाब सिंग गिल, तर सहअध्यक्षपदी नंदुरबारचे श्रावण उखा चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या समितीत अध्यक्ष, कार्याध्यक्ष, सहा सहअध्यक्ष, सचिव, सहा सहसचिव, संघटक, २७ निमंत्रित सदस्य आणि ६० सदस्य असे एकूण १०४ सदस्यांचा समावेश आहे. सहअध्यक्ष म्हणून देविदास राठोड, कैलास खसावत, भगिंदर सिंग, गुरचरण सिंग धडीसाज, मच्छिंद्र सिंग, शेर सिंग जुन्नी, सतीश निहलानी आदी प्रतिष्ठित व्यक्तींनाही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
शिख, सिकलीकर, बजारा-लबाना, मोहियाल, सिंधी व इतर सर्व समाज घटकांच्या सक्रिय सहभागातून हा कार्यक्रम एकता, भक्ती आणि राष्ट्रभावनेचा भव्य संगम ठरणार आहे.
श्री गुरु तेग बहादुर साहिबजी हे शिख धर्माचे ९ वे गुरु होते. त्यांचे जीवन म्हणजे धर्म, त्याग, परोपकार आणि मानवतेचे जिवंत प्रतीक होय. धर्मस्वातंत्र्य आणि मानवी हक्कांच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान भारतीय इतिहासातील अविस्मरणीय अध्याय आहे. अन्याय, अत्याचार आणि अधर्माविरुद्ध निर्भयपणे उभे राहून त्यांनी “सर्व धर्मांचा सन्मान, सर्व मानवतेचा उद्धार” हा संदेश दिला.
१७ व्या शतकात दिल्लीतील मुघल सत्ताधीशांच्या अत्याचाराला आव्हान देत त्यांनी प्राणार्पण केले. त्यांच्या शहीदीनंतर भाई लखीशा बंजारा यांनी आपला तांडा जाळून गुरुंच्या पार्थिवाला अग्नी देऊन अखंड श्रद्धेचा इतिहास घडविला. या घटनेने भारताच्या आध्यात्मिक परंपरेला नवी दिशा दिली आणि धर्मासाठी प्राणार्पण करण्याची प्रेरणा शतकानुशतके देत राहिली.
सन २०२५ हे गुरु तेग बहादुर साहिबजींचे ३५० वे शहीदी वर्ष असल्याने देशभरात त्यांचा गौरवशाली इतिहास जनमानसात पोहोचविण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. नांदेड येथे होणाऱ्या या सोहळ्यासाठी छत्रपती संभाजीनगर, परभणी, जालना, लातूर, धाराशिव, हिंगोली, बीड, नंदुरबार, धुळे, जळगाव या जिल्ह्यांतून लाखो भाविक उपस्थित राहणार आहेत.
या ऐतिहासिक नियुक्तीबद्दल धर्मजागरण समिती, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, मंत्री गिरीश महाजन, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, मुख्यमंत्री वैद्यकीय कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक, खासदार अशोक चव्हाण, राज्यसभा सदस्य अजित गोपछडे, माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित, आमदार राजेश पाडवी, जगदिश सकवान, निलेश जाधव आदी मान्यवरांचे श्रावण उखा चव्हाण यांनी मनःपूर्वक आभार मानले आहेत.
हा सोहळा केवळ धार्मिक नाही, तर राष्ट्रीय एकात्मतेचा आणि हिंदू-सिख ऐक्याचा प्रतीकात्मक पर्व ठरणार आहे. श्री गुरु तेग बहादुर यांच्या अमर त्यागातून आजही भारताच्या संस्कृतीचे तेज अधिक प्रखरतेने झळकत आहे — तेजस्वी, त्यागी आणि धर्मरक्षक गुरुंचे हे शतकोत्तर स्मरण, नवभारतासाठी प्रेरणास्त्रोत ठरणार आहे.


