नंदुरबार (प्रतिनिधी) नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने गुन्हेगारीविरोधातील मोहिमेत आणखी एक मोठे यश संपादन करत आंतरराज्यीय मोटारसायकल चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) केलेल्या या धडाकेबाज कारवाईत तब्बल ३० लाख ३० हजार रुपये किमतीच्या ३२ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या असून नंदुरबार, नाशिक, मध्यप्रदेश आणि गुजरातमधील एकूण १९ मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप यांनी गुन्हे आढावा बैठकीत जिल्ह्यातील प्रलंबित मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा गांभीर्याने आढावा घेत संबंधित गुन्ह्यांचा तपास वेगाने पूर्ण करण्याचे आणि सक्रिय गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्यांचा बारकाईने अभ्यास करून चोरीचे ठिकाण, वेळ, पद्धत, संशयित गुन्हेगारांची माहिती तसेच गुप्त बातमीदारांचे जाळे सक्रिय केले.
याच तपासादरम्यान २६ जून रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे म्हसावद येथील चिखली फाटा परिसरात सापळा रचण्यात आला. तेथे संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या दोन युवकांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी चोरीची स्प्लेंडर मोटारसायकल विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली. त्यानंतर त्यांच्या साथीदारालाही ताब्यात घेण्यात आले.
सखोल चौकशीत या तिघांनी नंदुरबार, नाशिक, मध्यप्रदेश आणि गुजरात राज्यातील विविध ठिकाणांहून मोटारसायकली चोरी करून त्या नातेवाईक, मित्र आणि परिचितांकडे लपवून ठेवल्याची माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी विविध ठिकाणी छापे टाकून ३२ चोरीच्या मोटारसायकली जप्त केल्या.
तपासात नंदुरबार जिल्ह्यातील २, नाशिक जिल्ह्यातील ५, मध्यप्रदेशातील ६ आणि गुजरातमधील ६ असे एकूण १९ गुन्हे उघडकीस आले आहेत. उर्वरित दुचाकींच्या मूळ मालकांचा शोध घेण्याचे काम सुरू असून संबंधित गुन्ह्यांची पडताळणी केली जात आहे.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षिका अश्विनी सानप आणि अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक मुकेश पवार, विकास गुंजाळ तसेच त्यांच्या संपूर्ण पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वाढता धाक
नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने गेल्या काही महिन्यांत अवैध धंदे, मोटारसायकल चोरी, घरफोडी, बनावट दारू, प्रतिबंधित गुटखा, अमली पदार्थ आणि इतर गंभीर गुन्ह्यांवर सातत्याने प्रभावी कारवाया केल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यात गुन्हेगारांमध्ये कायद्याचा धाक निर्माण झाला असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना अधिक बळकट होत आहे.
या कारवाईमुळे केवळ चोरीस गेलेल्या वाहनांचे मालकांनाच दिलासा मिळाला नसून, आंतरराज्यीय स्तरावर कार्यरत असलेल्या वाहनचोरीच्या टोळ्यांविरोधात नंदुरबार पोलीस सक्षम आणि सज्ज असल्याचा ठोस संदेशही गुन्हेगारांना मिळाला आहे. जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी नंदुरबार पोलीस दल अशाच धडाकेबाज कारवाया पुढेही सुरू ठेवणार असल्याचा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.


