नंदुरबार (प्रतिनिधी) : शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक बालकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. याच भावनेला साजेसा आनंदोत्सव येथील वेस्ट खान्देश भगिनी सेवा मंडळ, धुळे संचलित श्रीमती प्यारीबाई ओसवाल प्राथमिक विद्यामंदिरात उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आयोजित प्रवेशोत्सवाने संपूर्ण शाळा परिसर आनंद, उत्साह आणि चैतन्याने फुलून गेला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक राहुल मोरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षा जयश्री बोरसे, उपाध्यक्ष तथा पालक प्रतिनिधी हेमंत परदेशी आणि समिती सदस्य मंजुबेन जैन उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
यावेळी इयत्ता तिसरी व चौथीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागतगीत आणि ईशस्तवनाने वातावरण प्रसन्न झाले. त्यानंतर इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या चिमुकल्यांचे औक्षण करून त्यांना गुलाबपुष्प, फुगे आणि चॉकलेट देत प्रेमपूर्वक स्वागत करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि पालकांच्या डोळ्यांतील समाधान कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरले.
याच प्रसंगी सर्व शिक्षा अभियानांतर्गत प्राप्त झालेल्या पाठ्यपुस्तकांचे मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. प्रमुख पाहुणे हेमंत परदेशी यांनी विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करताना बदलत्या युगात गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेचा पहिला दिवस हा केवळ शिक्षणाचा प्रारंभ नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाच्या निर्देशानुसार उपस्थित मान्यवर, पालक आणि विद्यार्थ्यांनी पर्यावरण संवर्धनाची सामूहिक शपथ घेत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राहुल मोरे यांनी केले. सूत्रसंचालन सुनील वानखेडे यांनी तर आभार प्रदर्शन शशिकांत निकम यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन व आयोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख वैशाली पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि शालेय व्यवस्थापन समिती सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. नवागत विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण स्वागतामुळे नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात आनंददायी आणि संस्मरणीय वातावरणात झाली.


