नंदुरबार (प्रतिनिधी) नवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त शहरात हिंदु सेवा सहाय्य समिती व लताई आरोग्य धाम यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्रदीपक कन्यापूजन सोहळा संपन्न झाला. मोठा मारुती मंदिर सभागृहात पार पडलेल्या या धार्मिक व सांस्कृतिक सोहळ्यात १०९ कन्यांचे वैदिक मंत्रघोषात पूजन करून त्यांना नवीन कपडे, शालेय साहित्य व भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या वेळी कन्यांच्या नेत्रात देवीभाव तर पूजकांच्या डोळ्यांत भावाश्रू दिसत होते.
कार्यक्रमाची सुरुवात श्री दुर्गामातेच्या महाआरतीने झाली. यानंतर मान्यवर व यजमानांच्या हस्ते कन्यांचे पाद्यपूजन करून विधिवत पूजन करण्यात आले. सर्व कन्यांना नवीन पोशाख परिधान करून शालेय उपयोगी साहित्य प्रदान करण्यात आले. कन्याभोजनाच्या माध्यमातून या कन्यांचा सन्मान करण्यात आला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून भागवतकार हभप अविनाश महाराज जोशी, राजेशभैय्या परदेशी, डॉ. त्र्यंबक पाटील, डॉ. धर्मेंद्र जैन, डॉ. प्रीती ठाकरे, डॉ. सीमा जैन, शाखा व्यवस्थापक सागर बारोटे, विलास जोशी महाराज, हभप राजेंद्र कुलकर्णी, पंडित रविंद्र पाठक, नरेंद्र थेटे गुरुजी, जया जैन, केंद्र प्रमुख नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविकात डॉ. नरेंद्र पाटील यांनी नवरात्रीतील कन्यापूजनाचे महत्त्व स्पष्ट करून पुढील वर्षी इतिहासात कधीही न झालेला भव्य कन्यापूजन सोहळा करण्याची घोषणा केली. मनोगत व्यक्त करताना डॉ. प्रीती ठाकरे म्हणाल्या, “स्त्रीचा सन्मान फक्त नवरात्रीत नव्हे, तर रोजच केला पाहिजे. कन्यापूजनाइतकेच पुण्य स्त्रीसन्मानातून मिळते. मुलींना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देणेही अत्यावश्यक आहे.”
आशीर्वचनात हभप अविनाश जोशी महाराज म्हणाले, “घरी नवरात्रीत नऊ कुमारिका मिळणे कठीण जाते, परंतु येथे दरवर्षी १०९ कन्यांचे पूजन करण्याचे सौभाग्य मिळते. नारी ही शक्तीस्वरूप आहे. दररोज तिची उपासना व्हावी, हेच या पूजनाचे महत्त्व आहे.”
कार्यक्रमात संघटनेची प्रार्थना जागृती पाटील हिने केली. वैदिक मंत्रघोष अविनाश महाराज जोशी यांनी, महाआरती विलास महाराज जोशी यांनी केली. सूत्रसंचालन राजू चौधरी यांनी केले, तर आभार विनायक राजपूत यांनी मानले.
सोहळ्याची सांगता महिषासुरमर्दिनी स्तोत्राच्या गजरात १०९ कन्यांवर पुष्पवृष्टी करून करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हिंदु सेवा सहाय्य समितीचे धर्मसेवक व लताई आरोग्य धामचे विश्वस्त यांनी परिश्रम घेतले.


