छत्रपति संभाजिनगर दिनांक 24 ( प्रतिनिधि )
नाशिक येथे काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी पत्रकारांवर जीवघेणा हल्ला करून मारहाण केली. या घटनेत अनेक पत्रकार गंभीर जखमी झाले असून, राज्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या गुन्हेगारीचा हा धक्कादायक नमुना असल्याची तीव्र चर्चा सुरू झाली आहे.
गुन्हेगारी वाढण्याचे मूळ कारण हफ्तेखोरी व कायद्याच्या अंमलबजावणीतील कमजोरी असल्याचे नागरिकांचे स्पष्ट मत आहे. “राज्यात कॅबिनेट मंत्री असो, केंद्रीय राज्यमंत्रीची मुलगी असो वा पत्रकार असो, कुणीही सुरक्षित नाही. मग सामान्य गरीब जनता, महिला, शाळा-कॉलेजमधील मुली कशा सुरक्षित राहणार?” असा थेट सवाल लोकांमध्ये उपस्थित होत आहे.
राज्याचे गृहमंत्री कमजोर आणि कमकुवत ठरत असल्यामुळेच राज्यात गुन्हेगारी वाढीस लागली आहे, अशी जनतेत चर्चा रंगली आहे.
याच पार्श्वभूमीवर लोकशाही पत्रकार संघच्या वतीने 24 सप्टेंबर 2025 रोजी संभाजीनगर येथील विभागीय आयुक्त कार्यालयात निवेदन देण्यात आले. गुंडांना कठोर शिक्षा व्हावी, पत्रकारांसह नागरिकांना संरक्षण मिळावे, यासाठी या निवेदनातून ठाम मागणी करण्यात आली.
या प्रसंगी लोकशाही पत्रकार संघ चे राज्य उपाध्यक्ष नजीमोद्दीन काजी यांनी विभागीय आयुक्त कार्यलय (सामान्य प्रशासन विभाग) यांना निवेदन सादर केले. पत्रकारांवरील हल्ले लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर थेट हल्ला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
लोकशाही पत्रकार संघ ने इशारा दिला की, पत्रकारांच्या सुरक्षेबाबत शासनाने तातडीने ठोस भूमिका घेतली नाही तर मोठ्या आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल अशी माहिती लोकशाही पत्रकार संघ चे राज्य उपाअध्यक्ष पत्रकार नजीमोद्दीन काजी यांनी दिली आहे.


