नंदुरबार : गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त एकलव्य विद्यालयात महर्षी व्यास तसेच शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा अभिवादन सोहळा उत्साहात पार पडला. भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्याविषयीचा आदर आणि ऋण व्यक्त केले.
कार्यक्रमाची सुरुवात विद्यादायिनी माता सरस्वती आणि महर्षी व्यास यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. ध्रुव सहाणे याने प्रास्ताविकातून गुरुपौर्णिमेचे महत्त्व स्पष्ट केले.
यावेळी प्रमुख वक्ते राजेंद्र पाटील यांनी महर्षी व्यास यांच्या साहित्यिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक कार्याचा सविस्तर परिचय करून दिला. भारतीय संस्कृतीत गुरूंचे स्थान सर्वोच्च असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, असे त्यांनी विविध उदाहरणे, कथा आणि प्रेरणादायी प्रसंगांच्या माध्यमातून सांगितले. आधुनिक काळातही शिक्षक हे विद्यार्थ्यांचे खरे मार्गदर्शक असून त्यांचे संस्कारच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा पाया रचतात, असेही त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून जयदीप नटावदकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक धर्मेंद्र मराठे होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक डॉ. गिरीश पवार, पर्यवेक्षक टिका पाडवी, ज्येष्ठ शिक्षक वसंत वसईकर, मिलिंद वडनगरे, सुनिल पाटील, विजया न्हायदे, भुपेंद्र पाटील, संतोष पाटील, गौरीशंकर धुमाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
इयत्ता दहावी ‘ई’ तुकडीतील विद्यार्थ्यांनी विद्यालयातील सर्व शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दहावी ‘ई’ तुकडीतील विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. कु. प्राची मराठे आणि शफक खाटीक यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले, तर नचिकेत अर्थेकर याने उपस्थितांचे आभार मानले.
गुरुंच्या ज्ञान, संस्कार आणि मार्गदर्शनाबद्दल कृतज्ञता व्यक्त करणारा हा कार्यक्रम प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.


