नंदुरबार : वनपट्टाधारक शेतकऱ्यांचे e-KYC तांत्रिक कारणांमुळे पूर्ण होत नसल्याने कर्जमाफीची प्रक्रिया रखडली असून त्याच कारणामुळे पुढील पीक कर्जही मिळत नसल्याने शेतकरी गंभीर आर्थिक संकटात सापडले आहेत. या प्रश्नाची तात्काळ दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी समन्वय साधत e-KYC प्रक्रिया पूर्ण करून पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ तसेच पीक कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट)चे प्रदेश सरचिटणीस तथा नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री. रतन के. पाडवी यांनी जिल्हाधिकारी, नंदुरबार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यासह अनेक वनपट्टाधारक शेतकऱ्यांचे e-KYC तांत्रिक अडचणींमुळे पूर्ण होत नसल्याने शासनाच्या कर्जमाफी योजनेतील प्रक्रिया प्रलंबित राहिली आहे. परिणामी अनेक पात्र शेतकरी कर्जमाफीच्या लाभापासून वंचित राहत असून त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
याचबरोबर e-KYC पूर्ण नसल्याचे कारण पुढे करत बँकांकडून पुढील पीक कर्ज अथवा शेती कर्ज मंजूर केले जात नसल्याने शेतकऱ्यांसमोर दुहेरी संकट निर्माण झाले आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बियाणे, खते, कीडनाशके व इतर कृषी साहित्य खरेदीसाठी आवश्यक भांडवल उपलब्ध होत नसल्याने शेतीची कामे खोळंबली असून चालू हंगाम धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने महसूल विभाग, वन विभाग, बँका, UIDAI तसेच इतर संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय साधून वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या e-KYC संदर्भातील तांत्रिक अडचणी तातडीने दूर कराव्यात. तसेच कर्जमाफीची e-KYC प्रक्रिया पूर्ण करून पात्र लाभार्थ्यांना कर्जमाफीचा लाभ आणि पुढील पीक कर्ज त्वरित उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित विभागांना आवश्यक निर्देश द्यावेत, अशी मागणी श्री. रतन के. पाडवी यांनी निवेदनातून केली आहे.
वनपट्टाधारक शेतकऱ्यांच्या उपजीविकेशी निगडित हा अत्यंत गंभीर आणि तातडीचा प्रश्न असून प्रशासनाने याकडे संवेदनशीलतेने पाहून त्वरित सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षाही श्री. पाडवी यांनी व्यक्त केली आहे.


