नंदुरबार : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM-KISAN) योजनेअंतर्गत अक्राणी तालुक्यातील अनेक पात्र शेतकऱ्यांचे अर्ज दीर्घकाळापासून “Block Level Pending” स्थितीत प्रलंबित असल्याने शेतकरी आर्थिक लाभापासून वंचित राहत आहेत. या प्रकरणी तातडीने हस्तक्षेप करून सर्व पात्र शेतकऱ्यांचे अर्ज मंजूर करण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजितदादा पवार गट)चे प्रदेश सरचिटणीस तथा नंदुरबार जिल्हा परिषदेचे माजी सभापती श्री. रतन के. पाडवी यांनी जिल्हाधिकारी, नंदुरबार यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, अक्राणी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केले असून त्यांची स्थिती अनेक महिन्यांपासून “Block Level Pending” अशीच कायम आहे. संबंधित शेतकरी कृषी विभाग व इतर संबंधित कार्यालयांमध्ये वारंवार पाठपुरावा करूनही त्यांच्या अर्जांवर कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याने त्यांना शासकीय कार्यालयांच्या चकरा माराव्या लागत आहेत.
या विलंबामुळे पात्र शेतकरी केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या आर्थिक सहाय्यापासून वंचित राहत असून त्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश देऊन प्रलंबित अर्जांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करावेत आणि त्यांना योजनेचा लाभ त्वरित उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी श्री. रतन के. पाडवी यांनी केली आहे.
जिल्हा प्रशासनाने या गंभीर प्रश्नाची तातडीने दखल घेऊन प्रलंबित प्रकरणे निकाली काढल्यास अक्राणी तालुक्यातील शेकडो पात्र शेतकऱ्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.


