नंदुरबार (प्रतिनिधी) : शैक्षणिक वर्ष २०२६-२७ ची सुरुवात उत्साहपूर्ण आणि आनंददायी वातावरणात करण्यासाठी राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या वतीने नंदुरबार जिल्ह्यात शाळा प्रवेशोत्सव २०२६ चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. दि. १५ जून रोजी जिल्ह्यातील सर्व शाळा नियमित वेळेत सुरू होणार असून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
शाळेचा पहिला दिवस विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा मानला जातो. या दिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत आकर्षण निर्माण व्हावे, त्यांचा आत्मविश्वास वाढावा आणि शालेय जीवनाची सकारात्मक सुरुवात व्हावी, या उद्देशाने प्रवेशोत्सव साजरा केला जात आहे.
या कार्यक्रमासाठी राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे नंदुरबार जिल्ह्यात उपस्थित राहणार आहेत. ते धडगाव तालुक्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस आवासीय शाळा येथे विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपात स्वागत करणार आहेत. यावेळी खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी तसेच विविध विभागांचे अधिकारीही उपस्थित राहून नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत करतील.
प्रवेशोत्सवानिमित्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते मोफत पाठ्यपुस्तके व गणवेशांचे वाटप करण्यात येणार आहे. तसेच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० आणि विकसित महाराष्ट्र २०४७ या संकल्पनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे शिक्षण विभागाने सांगितले आहे.
जिल्ह्यातील शाळांमधील पटसंख्या वाढविणे, गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना देणे आणि विद्यार्थ्यांना शाळेकडे आकर्षित करणे या उद्देशाने प्रवेशोत्सव राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मिताली सेठी, नमन गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षणाधिकारी भानुदास रोकडे, माध्यमिक शिक्षणाधिकारी वंदना वळवी, योजना शिक्षणाधिकारी उर्मिला पारधे, उपशिक्षणाधिकारी निलेश लोहकरे, भावेश सोनवणे, डॉ. युनूस पठाण तसेच सर्व तालुक्यांतील गटशिक्षणाधिकारी तयारीत व्यस्त आहेत.
शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थितीमुळे यंदाचा शाळा प्रवेशोत्सव विशेष ठरणार असून जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रात नवचैतन्य निर्माण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


