“यंग प्रोफेशनल्स राउंडटेबल”मधून डिजिटल वेलनेस, नेतृत्व आणि राष्ट्रनिर्माणावर मंथन
नंदुरबार, (दि. 29 मे 2026) देशाला “विकसित भारत 2047” या ध्येयाकडे नेण्यासाठी केवळ आर्थिक प्रगती नव्हे, तर मानसिकदृष्ट्या सक्षम, तंत्रज्ञानसाक्षर आणि मूल्याधिष्ठित युवा पिढी घडविणे अत्यावश्यक असल्याचा महत्त्वपूर्ण संदेश नंदुरबार येथे आयोजित “Viksit Bharat Young Leaders Dialogue 2026 – Young Professionals Roundtable” या विशेष कार्यक्रमातून देण्यात आला. युवकांच्या सर्वांगीण विकासाला केंद्रस्थानी ठेवून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाने नंदुरबार जिल्ह्यात नव्या वैचारिक चळवळीची सुरुवात केल्याचे चित्र पाहायला मिळाले.
युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मार्गदर्शनाखाली माय भारत नंदुरबार आणि झेप फाउंडेशन (World Digital Detox Day) यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम पार पडला. “विकसित भारतासाठी भविष्य-सज्ज मनुष्यबळ घडवणे” हा कार्यक्रमाचा मुख्य विषय होता. विशेष म्हणजे, नंदुरबारच्या इतिहासात प्रथमच अशा स्वरूपाचा “Young Professionals Roundtable” आयोजित करण्यात आला होता.
ग्रामीण आणि आदिवासी भागातील युवकांना राष्ट्रीय विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न या कार्यक्रमातून प्रभावीपणे करण्यात आला. डॉ. रेखा चौधरी आणि झेप फाउंडेशन यांच्या पुढाकारातून तसेच काकासाहेब महाविद्यालयाच्या सहकार्याने हा उपक्रम साकार झाला. युवकांना केवळ नोकरीसाठी नव्हे, तर नेतृत्व, नवोन्मेष, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्माणासाठी तयार करण्याचा व्यापक दृष्टिकोन या कार्यक्रमामागे होता.
कार्यक्रमाला माजी आमदार श्री. शिरीषदादा चौधरी, झेप फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. रेखा चौधरी, जिल्हा युवा अधिकारी श्री. भुषण पाटील, नंदुरबार नगरपालिकेचे उपाध्यक्ष श्री. प्रथमेश चौधरी, नगरसेवक श्री. गौरव चौधरी, मुंबई येथील सोनिया देशमुख तसेच डॉ. चंद्रकांत वाणी आदी मान्यवर उपस्थित होते. पॅनलिस्ट म्हणून डॉ. रेखा चौधरी, प्रा. युवराज भामरे आणि मुंबईचे ॲड. सारांश सोनार यांनी युवकांना मार्गदर्शन केले.
आजच्या झपाट्याने बदलणाऱ्या डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), सोशल मीडिया आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे युवकांसमोर नव्या संधींसह गंभीर मानसिक आणि सामाजिक आव्हानेदेखील उभी राहत आहेत. या पार्श्वभूमीवर डिजिटल वेलनेस, डिजिटल व्यसनमुक्ती, मानसिक आरोग्य, एकाग्रता, नेतृत्व विकास, रोजगारक्षम कौशल्ये, उद्योजकता आणि राष्ट्रनिर्माणातील युवकांची भूमिका या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
डॉ. रेखा चौधरी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “विकसित भारत 2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी डिजिटलदृष्ट्या सक्षम पण मानसिकदृष्ट्या संतुलित युवा पिढी घडविणे अत्यावश्यक आहे.” त्यांनी पुढे नमूद केले की, World Digital Detox Day ही जागतिक चळवळ आज 78 देशांमध्ये डिजिटल वेलनेस आणि संतुलित तंत्रज्ञान वापराबाबत जनजागृती करत असून युवकांना अधिक सर्जनशील, उत्पादक आणि राष्ट्राभिमुख बनविण्याचे कार्य करत आहे.
राउंडटेबल चर्चेदरम्यान युवकांनी कौशल्य विकास, रोजगार, मानसिक स्वास्थ्य, डिजिटल शिस्त, सामाजिक नेतृत्व आणि नवकल्पना यासंदर्भात विविध विधायक सूचना मांडल्या. युवकांमध्ये केवळ सरकारी नोकरीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलून नवउद्योजकता, स्टार्टअप संस्कृती आणि सामाजिक नेतृत्व याकडेही आकर्षण वाढत असल्याचे चर्चेतून स्पष्ट झाले.
या कार्यक्रमात सुमारे 200 युवक-युवती सहभागी झाले होते. पॅनलिस्ट आणि युवकांमधील मुक्त संवादामुळे अनेक सकारात्मक आणि दूरदृष्टीपूर्ण विचार समोर आले. चर्चेतून समोर आलेल्या शिफारसी पुढील काळात विकसित भारत 2047, माय भारत मिशन आणि World Digital Detox Day च्या जनजागृती अभियानांमध्ये समाविष्ट करण्याचा मानस आयोजकांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रभावी सूत्रसंचालन प्रा. सुचित पिंगळे यांनी केले.
“विकसित भारतासाठी तंत्रज्ञान आवश्यक आहे; मात्र त्याहून अधिक महत्त्वाचा आहे मानसिकदृष्ट्या सक्षम, संतुलित, मूल्यनिष्ठ आणि जबाबदार युवा,” हा संदेश या युवा राउंडटेबलमधून प्रभावीपणे अधोरेखित झाला.


