नंदुरबार, (दि. २ फेब्रुवारी २०२६) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सादर झालेला केंद्रीय अर्थसंकल्प २०२६-२७ हा वाढ, समावेश आणि सुधारणा यांचा समतोल साधणारा असून ‘विकसित भारत २०४७’ या ध्येयाच्या दिशेने देशाला वेगाने पुढे नेणारा आहे, असे प्रतिपादन भाजप प्रदेश महामंत्री मा. श्री. विजयभाऊ चौधरी यांनी केले. केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर भाजपा जिल्हा कार्यालय, नंदुरबार येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर भाजप प्रदेश प्रवक्ते गोविंद बोरसे, जिल्हाध्यक्ष निलेश माळी व जिल्हा सरचिटणीस सदानंद रघुवंशी उपस्थित होते. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत भाजपची भूमिका मांडताना विजय चौधरी यांनी सांगितले की, हा अर्थसंकल्प शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक, उद्योजक, कामगार, नोकरदार, गरीब व मध्यमवर्गीय घटकांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारा आहे.
कृषी, एमएसएमई, कौशल्यविकास, पायाभूत सुविधा, आरोग्य, औषधनिर्मिती, शिक्षण, पर्यटन, क्रीडा, पशुसंवर्धन, मत्स्यव्यवसाय आणि नवतंत्रज्ञान क्षेत्रांना भरीव प्रोत्साहन देण्यात आले आहे. देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षणासाठी मुलींसाठी वसतिगृहे उभारण्याचा निर्णय हा महिलांच्या सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच आतापर्यंत २५ कोटी नागरिकांना दारिद्र्यरेषेतून बाहेर काढण्यात यश मिळाल्याची नोंद ही सरकारच्या सामाजिक न्यायाच्या धोरणांची प्रचिती असल्याचे त्यांनी सांगितले.
पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी देशातील २० महत्त्वाच्या पर्यटन केंद्रांवर १० हजार प्रशिक्षित गाईड तयार करण्यात येणार असून भारताला मेडिकल टुरिझमचे जागतिक केंद्र बनवण्याच्या दिशेने आरोग्य व आयुष क्षेत्राचा विस्तार करण्यात येणार आहे. Bio-Pharma, Semiconductor Mission, Chemical Parks, Mega Textile Parks यांसारख्या उद्योगांमुळे रोजगारनिर्मितीला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात निधीची तरतूद करण्यात आली असून मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे दळणवळण, उद्योग व व्यापाराला चालना मिळणार आहे. एआय, कौशल्यविकास आणि एमएसएमई क्षेत्रांना प्रोत्साहन देऊन भारताला आत्मनिर्भर आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक बनवण्याचा सरकारचा निर्धार या अर्थसंकल्पातून स्पष्ट होतो, असेही चौधरी यांनी सांगितले.
नवीन आयकर कायदा १ एप्रिल २०२६ पासून लागू होणार असून करभरणा प्रक्रिया अधिक सुलभ व पारदर्शक होणार आहे. यामुळे मध्यमवर्गीय व नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळेल. एकूणच हा अर्थसंकल्प “सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास” या तत्वज्ञानावर आधारित असून सर्वसामान्यांच्या जीवनमानात सकारात्मक परिवर्तन घडवणारा ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पत्रकारांच्या प्रश्नांना विजय चौधरी यांनी समर्पक उत्तरे दिली.


