नंदुरबार, दि. १६ जुलै : राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ हे शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून शेती, आरोग्य, विकास कामे तसेच विविध शासकीय योजनांचा आढावा घेणार आहेत.
दौऱ्यानुसार, गुरुवार (दि. १६ जुलै) रोजी रात्री ११.३० वाजता मुंबईतील शासकीय निवासस्थान ‘विशाळगड’ येथून दादर रेल्वे टर्मिनसकडे प्रयाण करून रात्री १२.१५ वाजता दादर-भुसावळ एक्सप्रेसने ते नंदुरबारकडे रवाना होतील. शुक्रवार (दि. १७ जुलै) रोजी सकाळी ८.२५ वाजता नंदुरबार रेल्वे स्थानकावर आगमनानंतर ते शासकीय विश्रामगृहात दाखल होतील.
सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन हॉल (व्हीसी रूम) येथे पालकमंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली पर्जन्यमानाचा आढावा, पेरणीची सद्यस्थिती, बियाणे, खते तसेच शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत बैठक होणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पोलीस अधीक्षक उपस्थित राहणार आहेत.
त्यानंतर सकाळी ११.०० ते १२.०० या वेळेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयांतर्गत विविध विकास कामांचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये महिला व बाल रुग्णालयातील एसएनसीयू (Special New Born Care Unit), मिल्क बँक (दुग्धपेढी), क्षयरोग अतिदक्षता कक्ष, बालरोग अतिदक्षता कक्ष (PICU) तसेच इतर विकास कामांचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात येणार आहे.
दुपारी १२.०० ते १२.३० या वेळेत जिल्हा रुग्णालय सभागृहात जिल्हा एकात्मिक आरोग्यवर्धिनी समिती, जिल्हा संनियंत्रण व सल्लागार समिती तसेच जिल्हा पालक जन आरोग्य संरक्षण कार्यकारिणी समितीच्या बैठका पार पडतील.
दुपारी १२.४० वाजता लोकनेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘सेवा सप्ताह’ कार्यक्रमांतर्गत धुळे रोडवरील संजय टाऊन हॉल येथे आयोजित बूथ कार्यकर्ता (BLA) मेळाव्यास पालकमंत्री उपस्थित राहतील. दुपारी १.३० ते २.३० हा वेळ राखीव ठेवण्यात आला आहे.
यानंतर दुपारी ३.०० वाजता ते प्रकाशा (ता. शहादा) येथे रवाना होतील. दुपारी ३.३० वाजता श्री केदारेश्वर देवस्थानाचे दर्शन घेऊन प्रकाशा तीर्थक्षेत्राची पाहणी करतील. त्यानंतर दुपारी ४.३० वाजता शहादा तहसील कार्यालयात शासनाच्या विविध विभागांच्या विकास योजनांचा तालुकास्तरीय आढावा घेतील.
सायंकाळी ६.०० ते ६.३० या वेळेत शासकीय विश्रामगृह, शहादा येथे नागरिकांच्या गाठीभेटी घेण्यात येतील. रात्री ८.५५ वाजता नंदुरबार रेल्वे स्थानकावरून दादर-भुसावळ एक्सप्रेसने ते मुंबईकडे रवाना होणार आहेत.


