नंदुरबार (प्रतिनिधी) – जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आज जाहीर झालेल्या तालुकानिहाय आरक्षण सोडतीनंतर नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याचे चित्र दिसून आले आहे. अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग व महिला आरक्षणामुळे अनेक गटांची संरचना बदलली असून गेल्या वर्षभरापासून लोकसंपर्क, सामाजिक बांधिलकी, मंडळांमधील सहभाग, वर्गण्या, कार्यक्रमांमध्ये उपस्थिती अशा माध्यमांतून आपली ताकद दाखवणाऱ्या अनेक इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाल्याचे दिसून येत आहे.
अक्कलकुवा, अक्राणी, तळोदा, शहादा, नंदुरबार आणि नवापूर या सर्व तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनुसूचित जमाती व अनुसूचित जमाती महिलांसाठी गट राखीव झाल्याने बहुतेक सर्वसामान्य व नागरिकांचा मागास प्रवर्ग मधून येणाऱ्या पुरुष उमेदवारांना या वेळी स्पर्धेबाहेर रहावे लागणार आहे. विशेष म्हणजे, अक्कलकुवा तालुक्यातील भगदरी, पिंपळखुटा, मोरखी, मोरांबा हे गट अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव झाल्याने अनेक पुरुष इच्छुकांचे स्वप्न धुळीस मिळाले आहे. तर अक्राणी तालुक्यातील सावऱ्यादिगर, तेलखेडी, कात्री रे., मांडवी बु. हेही महिला आरक्षित गट ठरले आहेत.
शहादा तालुक्यातील आरक्षणामुळे तर मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. येथे मोहिदे तर्फे शहादा गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने काही प्रमुख नेत्यांचे राजकीय गणित कोलमडले आहे. त्याचवेळी म्हसावद, सुलतानपूर हे गट अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठरल्याने महिलांना मोठी संधी मिळाल्याचे चित्र आहे. वडाळी, कहाटूळ, सारंगखेडा, लोणखेडा, प्रकाशा या गटांवर नागरिकांचा मागास प्रवर्ग व नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षण आल्याने अनेक प्रतिष्ठित नेत्यांची जागा राखीव गटात गेल्याने त्यांना पर्यायी गट शोधण्याची वेळ आली आहे.
नंदुरबार तालुक्यातही आरक्षणाचा फटका मोठ्या प्रमाणावर बसला आहे. कोपर्ली गट नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आणि मांडळ, रनाळा, कोळदे, खोंडामळी हे गट नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी राखीव झाल्याने स्थानिक पातळीवरील सक्रिय पुरुष उमेदवारांचा हिरमोड झाला आहे. तर पातोंडा, नांदर्खे, धानोरा हे गट अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव असल्याने महिलांना पुढे येण्याची सुवर्णसंधी निर्माण झाली आहे.
नवापूर तालुक्यात तर महिला उमेदवारांसाठी ‘सोन्याची संधी’ निर्माण झाली आहे. सात गट अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव ठरल्याने येथील राजकीय समीकरणात महिलांचे वर्चस्व वाढणार आहे, तर पारंपरिक पुरुष नेतृत्वाच्या गोटात निराशेचे वातावरण आहे.
या सर्व घडामोडींमुळे नंदुरबार जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अनेक गटांमध्ये उमेदवारांनी गेल्या वर्षभरापासून सामाजिक संपर्क वाढवून, गणेशोत्सव व नवरात्रोत्सवातील मंडळांमध्ये देणग्या देऊन, विविध सुखदुःखात सहभागी होत जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, आजच्या आरक्षण सोडतीने त्यांचे सर्व गणित विस्कटल्याचे चित्र आहे.
तथापि, महिला आरक्षणाच्या वाढत्या संख्येमुळे राजकारणात नवीन चेहरे पुढे येण्याची शक्यता वाढली आहे. अनुसूचित जमाती व मागास प्रवर्गातील महिलांना राजकीय सक्षमीकरणाची संधी मिळाल्याने अनेकांनी उत्साह व्यक्त केला आहे. आता आगामी काळात कोण कोणत्या गटातून आपला राजकीय पत्ता बदलते, कोण नवीन चेहरे पुढे येतात आणि कोण आपली ताकद टिकवतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.


