पारोळा : महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेच्या वतीने दिवंगत सहकारी कै. श्री. पी. एन. पाटील साहेब यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन करण्यात आले. यावेळी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी होत त्यांना आत्मिक बळ, धैर्य आणि मानसिक आधार दिला.
यावेळी दिवंगत पाटील यांच्या पश्चात असलेल्या मुली, मुलगा, भाऊ तसेच संपूर्ण कुटुंबीयांशी संवाद साधून संघटनेच्या वतीने संवेदना व्यक्त करण्यात आल्या. या दुःखद प्रसंगी संघटना कुटुंबीयांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
या सांत्वनभेटीस महाराष्ट्र राज्य तांत्रिक ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष श्री. नितीनजी धामणे, राज्य सचिव श्री. हरिश्चंद्र काळे, राज्य उपाध्यक्ष श्री. योगेशजी पगार, संभाजीनगर जिल्हाध्यक्ष श्री. सुरेश चौधरी, नाशिक तालुकाध्यक्ष श्री. श्रावणजी वाकचौरे, देवळा येथील संघटक श्री. अरुणजी पाटील, नाशिकचे मार्गदर्शक श्री. संजय बाविस्कर आणि कोषाध्यक्ष श्री. विनोद अहिरे यांच्यासह ज्येष्ठ ग्रामपंचायत अधिकारी श्री. दिलीप पाटील, श्री. सुनील बेलदार तसेच पारोळा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी पारोळा तालुक्यातील ग्रामपंचायत अधिकारी बांधवांशी संवाद साधत दिवंगत सहकाऱ्याच्या कुटुंबीयांच्या दुःखात संघटना एकजुटीने सहभागी असल्याचे सांगितले.
“शासनाची खुर्ची रिकामी झाली तर त्या ठिकाणी दुसरा माणूस मिळतो; परंतु कुटुंबातील एक माणूस गेल्यानंतर निर्माण झालेली पोकळी कोणत्याही व्यक्तीने भरून निघत नाही,” या भावनिक शब्दांत उपस्थितांनी दिवंगत सहकाऱ्याच्या निधनाचे दुःख व्यक्त केले.
ग्रामपंचायत अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी राज्यस्तरीय धोरणाची मागणी
दरम्यान, भविष्यात ग्रामसभेतील गैरशिस्तीमुळे अशा प्रकारच्या दुःखद घटना घडू नयेत, यासाठी तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी संघटनांना विश्वासात घेऊन लवकरच बैठका घेण्यात येतील, अशी ग्वाही राज्याध्यक्ष श्री. नितीनजी धामणे यांनी दिली.
ग्रामपंचायत स्तरावर कार्यरत सरपंच, ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचारी यांचे संरक्षण तसेच ग्रामसभेत सहभागी होणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा समतोल साधणारे धोरण शासनापुढे मांडण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गावातील पिढ्यान्पिढ्यांचे वाद, वैयक्तिक संघर्ष, गावावरील वर्चस्वाची स्पर्धा आणि राजकीय मतभेद यांचा ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामकाजावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी स्पष्ट कार्यपद्धतीची आवश्यकता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गंभीर परिस्थितीत ग्रामपंचायत अधिकारी व कर्मचाऱ्यांना कायदेशीर कार्यवाहीसोबत आवश्यकतेनुसार विनामूल्य पोलीस संरक्षण मिळावे, यासाठी शासनाकडे ठोस मागणी करण्यात येणार असल्याचे धामणे यांनी स्पष्ट केले.
यापुढे या सर्व बाबींचा संघटितपणे विचार करून राज्यस्तरीय धोरण आणि ठोस मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी उपस्थित ग्रामपंचायत अधिकारी बांधवांना दिली.
कै. श्री. पी. एन. पाटील साहेब यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही. त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याचे बळ, धैर्य आणि आत्मिक शक्ती लाभो, हीच यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करण्यात आली.


